शिवथरघळ
दोन्ही बाजूंना डोंगरांचे कडे आणि मध्येच असलेली अरुंद दरी, म्हणजेच घळ. सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये अशा अनेक घळी आहेत. अनेक घळींना इतिहास आहे आणि त्या प्रसिद्ध आहेत. परंतु सर्वांत प्रसिद्धीला आली, ती समर्थ रामदासस्वामींची शिवथर घळ. शिवथर घळ ही तिथल्या निसर्गसौंदर्यामुळं, पावसाळ्यात तिथं कोसळणाऱ्या धबधब्यामुळं पर्यटकांना आकर्षित करते.
रामदासस्वामी १६४९मध्ये या प्रदेशातील घळीत वास्तव्यास आले. त्यांनी १६६०पर्यंतचा काळ इथं व्यतीत केला आणि त्या काळात त्यांनी दासबोध आणि इतर ग्रंथसाहित्याची निर्मिती केली. दक्षिण दिग्विजयासाठी जाण्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी शिवथर घळीत येऊन समर्थांचा आशीर्वाद घेतला होता.
जवळपास पाहण्यासाठी ठिकाणेः
शिवथरघळ पायर्या चढून आल्यावर समोरच ‘शिवथरघळ श्री सुंदरमठ सेवा समिती’ ने स्थापन केलेली इमारत लागते. इमारतीहून पुढे गेल्यावर सरळ जाणारा रस्ता थेट घळीपाशी घेऊन जातो. घळी मधे श्री समर्थांची मूर्ती आहे. याच घळीत समर्थांनी दासबोध लिहिला. घळीच्या समोरच सुंदर धबधबा आहे. धीरगंभीर आवाज करीत धरतीवर कोसळणारा मोठा धबधबा पाहून खरच स्वप्नात असल्यासारखे भासते. घळीच्या वरील डोंगरसपाटीवर चंद्रराव मोऱ्यांच्या वाड्याचे अवशेष आहेत. या सपाटीवरून राजगड, रायगड, तोरणा आणि प्रतापगड सारख्याच अंतरावर आहेत.
कसे जाल?
शिवथरघळीला जाण्यासाठी पायथ्यापर्यंत चांगला गाडी रस्ता आहे. पुढे १०० पायऱ्या चढून गेल्यावर आपण घळीपाशी पोहोचतो. मुंबई- गोवा महामार्गावर महाडच्या पुढे एक नदीवरील पूल लागतो. त्याच्या पुढे डाव्या बाजूला भोरकडे जाणारा वरंध घाटाचा फाटा लागतो. या रस्त्याने भोरच्या दिशेला जातांना बारस गाव आहे. येथे शिवथरकडे अशी पाटी लावली आहे. येथून पुढे साधारण ३० किमी अंतर पार केल्यावर आपण शिवथरघळीच्या पायथ्याशी पोहोचतो. वाटेत कुंभे शिवथर, कसबे शिवथर, अंबे शिवथर ही गावे लागतात.–
पुण्याहून भोर-वरंध-बिरवाडीमार्गे शिवथर घळ सुमारे १११ किलोमीटर.
– मुंबईहून गोवा महामार्गानं माणगाव-लोणेरे-महाड-बिरवाडीमार्गे २०५ किलोमीटर